बोगस व चढ्या दराने होणारी बियाणांची विक्री थांबवा – राजू मुळीक
दहिवडी प्रतिनिधी
शेतकऱ्यांची बियाणे विक्रेत्यांकडून आर्थिक लूट व फसवणूक होत असल्याचा आरोपदहिवडी : माण तालुक्यात बोगस व चढ्या दराने होणारी विक्री थांबवण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माण तालुका अध्यक्ष राजू मुळीक यांनी कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे. तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची बियाणे विक्रेत्यांकडून आर्थिक लूट व फसवणूक होत असल्याचा आरोपही त्यांनी निवेदनातून केला आहे.त्यांनी पुढे म्हटले आहे की,माणमधील शेतकरी दुष्काळाच्या झळा सहन करत कसेबसे दिवस काढत आहे. सध्या चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पेरण्याची लगबग सुरू आहे. परंतु बियाणे विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक ही शेतकऱ्यांचा हंगाम वाया जाण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे शेतकऱ्यास आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून चढ्या दराने होणारी बियाणे विक्री ही त्यात भर घालत आहे. याप्रकरणी आपण लक्ष घालून सर्व बियाणे विक्रेत्यांना योग्य प्रकारे सूचित करावे. शेतकऱ्यांप्रति झालेल्या हलगर्जीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना शांत बसणार नसल्याचेही त्यांनी निवेदनातून म्हटले आहे.यावेळी केशव जाधव,सतीश भोसले,दादासाहेब शिंनगारे,दादासाहेब भोसले,प्रमोद नारनवर, ऋषी मोटे आदी उपस्थित होते.